Tuesday, October 28, 2014

Nice Article by Nana Patekar नाना पाटेकर यांचा अप्रतिम लेख.

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"


वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने.  त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.
--
"दोन गुरु"-
By नाना पाटेकर....

हा मेसेज WhatsApp वर आलेला आहे याची विश्वासाहर्ता लेख वाचून खरी वाटली म्हणून शेयर करत आहे. जर याबाद्द्ल कुणाला काही आक्षेप असल्यास कळविणे.

Wednesday, October 22, 2014

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली



एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली !!

लेखक : अनोळखी

Saturday, September 13, 2014

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो


ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो, हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
जुगलबंदी चालू होती दोघांची.. 
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी.. 
आनंदी आता आहे का तेव्हा होतो ? 
आठवता आठवता दुखी होतो....
तेव्हा Local जीन्स वापरायचो...
आता CK, Levis, Pepe धूळ खात पडल्या आहेत माझ्या...

तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची.... 
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो.. लांब लांब फिरायला जायचो... 
आता tank फुल्ल असूनही... मित्रांना मुकलो....
टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला, 
पण हा फरक मनाला नाही पटला..
PCO वरुन बोलायची तेव्हा मजा यायची... 
आता postpaid Mobile असूनही बोलायला नाही कुणी..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
दिवस बदलले ... General class मधून First Class झाला. 
पण फिरायला आता वेळ नाही उरला...
तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत.. 
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...
खरी मैत्री Professional friends मधे बदलली 
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,.... हे दिवस चांगले की कॉलेजचे ..

यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
  
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत...
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥

मराठी किंवा हिंदी भाषेत सहजपणे, ‘ Android मोबाईल ‘ वरुन मेसेज कसा लिहायचा ?

यासाठी qwerty या english keyboard चा वापर करता येईल का? - Using QUERTY keyboard to type in marathi.

असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल तर खालील मेसेज नक्की वाचा. :- मकरंद टिल्लू


मराठी भाषेत गोडवा आहे. देवनागरी लिपी मध्ये Sms, whatsapp, facebook वर लिहिले तर मजकूर लगेच समजतो आणि प्रतिसादही मिळतो
उदाहणार्थ : mala khup aanand zala.
याऐवजी: मला खूप आनंद झाला
हे वाचण्यास सोपे जाते. 

काही लोक देवनागरीत + English असा message लिहितात.
तो message जास्तीत जास्त लोक वाचतात . तो कसा लिहितात त्या मागचे रहस्य तुम्हाला लवकरच कळणार आहे. अजूनही तुम्ही हा मेसेज वाचता आहात म्हणजे तुमच्यात उत्सुकता जागृत आहे. हार्दिक अभिनंदन ! 

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून मातृभाषेसाठी सहकार्य करा. : - मकरंद टिल्लू 
मराठी बरोबरच English असे एकत्र लिहिता येईल असे app आणि त्याचा keyboard वापरण्यातील मजा तुम्ही लवकरच अनुभवाल.

मुख्य म्हणजे यात a= अ आहे.

khup असे लिहिले की ' खूप ' असे येते.

तसेच सुमारे 10 , option ही मिळतात. Interesting वाटते आहे मग try करण्यासाठी
खालील steps वाचा. 


स्टेप 1 :- गुगल प्ले स्टोअरवर जा.
Step 1:- go to Google play store

स्टेप 2 :- google hindi input असे सर्च करा.
Step 2:- search for: google hindi input




स्टेप 3 :- अप्लिकेशन डाउनलोड करा.
Step 3 :- Download the app

स्टेप 4 :- सेटिंग्स ला जा. त्यामध्ये ‘ language and input ‘ मध्ये जा. त्यामध्ये ‘ Keyboards and input methods ’ मध्ये Default : ‘ Hindi transliteration– Google Hindi Input ‘ असे निवडा. 

त्यानंतर खालील ‘Google Hindi Input Hindi transliteration ‘ या समोरील चौकोनात बरोबरची खुण करा. आणि अन्य keyboard वरील बरोबरची खुण काढून टाका. 

step 4 :- go to settings . Go to ‘ language and input ‘. Then in ‘ Keyboards and input methods ‘ select : ‘ Hindi transliteration – Google Hindi Input ‘ as default keyboard. Then in square below that make a tick on ‘Google Hindi Input Hindi transliteration ‘ and remove tick mark on other keyboards. 





स्टेप 5 : मराठी अथवा हिंदी भाषेत मेसेज लिहिण्याचा आनंद घ्या.
Step 5: enjoy writing.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.
https://www.youtube.com/watch?v=UB3-JWI7Raw

मराठी इंगजी डिक्शनरी तसेच कॉम्पुटर वर मराठी type करण्यासाठी आमची 
http://marathisaahitya.blogspot.in/2013/12/marathi-english-dictionary.html
पोस्ट पहा.

आपल्या प्रतिक्रिया खाली दयाव्यात हि विनंती. 

Tuesday, September 9, 2014

नरेंद्र मोदी यांचा शिक्षक दिन संदेश | Narendra Modi Teacher's Day Message



नमोंची नवीन कल्पक खेळी
निमित्त शिक्षक दिनाचे
संवाद साधला मुलांशी यावेळी 
संयोजन प्रसार माध्यमांचे


अठरा लक्ष शाळा सामील 
मुलामुलींनी आणली बहार
प्रथमच अनुभवला देशाने
पंतप्रधानांशी थेट संवादाचा थरार


प्रारंभीचे बोल नेमके 
ठाम प्रेरक बोधक वक्तव्य 
सांगितले शाळकरी मुलांना 
तुमच्या हातीच देशाचे भवितव्य


उत्तरोत्तर रंगला जश्न
प्रश्नोत्तराचा तास 
मुलांचे विविधरंगी प्रश्न 
अन् मोदींचे उत्तर खास


विचारता कशी वाटते राजधानी 
आलात मायभूमी सोडून 
म्हणाले व्यस्त कामातच
दिल्ली पहायचे गेले राहून


विषय येता जपान भेटीचा
जिद्द शिस्त स्वावलंबनाने केले स्तिमित
देशप्रेम एकोपा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा
घडवू आपला देश असाच इच्छा अपरिमीत


यातून काय लाभ पुसता
न मो झाले व्यथित
ध्येय असता देशकार्याचे
लाभ नसावा मनात


नाचा बागडा भरपूर खेळा
फावला वेळ द्या वाचनास
वने उपवने डोंगरांच्या माळा
पाऊस वारा ऊन चांदणे दाखवा लोचनास


समारोपाचे शब्दही समर्पक
फिटले पारणे मुलांचे 
मानले आभार माध्यमांचे
न् सर्व उपस्थित जनांचे


माळी राबतो अन् फुलते बाग
जशी सुंदर फुले मिळती देवाला 
तशीच घडवून पिढी उद्याची
करू अर्पण राष्ट्राला ॥